गोकुळाष्टमी
【® माहिती डाऊनलोड करा ग्रुप वर पाठवा ©】
श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीला रोहिणी नक्षत्र असताना कंसाच्या बंदिशाळेत
,गोकुळात झाला म्हणून या दिवसाला गोकुळाष्टमी म्हणतात. संपूर्ण भारतात सर्व ठिकाणी अतिशय उत्साहात हा जन्मदिवस साजरा करतात. या दिवशी विविध खाद्यपदार्थ दही, दूध, लोणी एकत्र करून कालाविणे म्हणजेच “काला” होय. यालाच दहीकाला असे म्हणतात. या दिवशी दहीकाला करून खाण्याचा प्रघात आहे. श्रीकृष्णाचा हा आवडता खाद्यपदार्थ होता.
श्रीकृष्ण श्रीमंत घरात जन्मला असूनदेखील गरीब, दिनदुबळ्या गवळ्यांच्या मुलांमध्ये
रमला, बागडला. या मुलांना दूध-दही मिळत नसे तेंव्हा श्रीकृष्ण आपली व सर्व सवंगड्यांची शिदोरी एकत्र करून त्याचा काला करून खात असे. श्रीकृष्णाने कधीही गरीब श्रीमंत वा उच्च नीच असा भेदभाव केला नाही. त्याला अर्जुनाबद्दल जितके प्रेम होते तेवढेच सुदाम्याबद्दल आपलेपण होते.ह्यामधूनच समाजाशी एकरूप होण्याचे त्याचे आचरण दिसून येते.
भाविक मंडळी अष्टमीला उपवास करतात व नवमीला सोडतात. या दिवशी सर्व लहान थोर मानवी साखळी काढून रस्त्याने मिरवणूक काढतात. तेंव्हा घराघरातून लोक घागरी भरून त्यांच्यावर पाणी ओततात. ठिकठीकाणी चौकाचौकात बांधलेली दहीहंडी मानवी मनोरा रचून शाररीक कौशल्याने ती फोडतात ह्या सणातून आपल्याला खेळाचे, शाररीक कौशल्याचे म्हणजेच आरोग्याचे महत्व पटते. समाजात एकोपा राहण्यासाठी, प्रेम वाढविण्यासाठी असे खेळ खूप मोलाची भूमिका निभावतात. श्रीकृष्ण तर दहीहंडी, विटीदांडू, मल्लकुस्ती अशा खेळांचा आद्यपुरस्कर्ता होता. ह्या सर्व भारतीय खेळांचा प्रसार श्रीकृष्णामुळे सर्वसामान्यांपर्यंत झाला.
श्रीकृष्णाने कर्माचे महत्व गीतेद्वारे सांगून आपल्या कर्तव्यात कधीही कसूर करू नये हा संदेश समाजाला दिला. श्रीकृष्णाचे संपूर्ण आयुष्य हे समाजासाठी एक आदर्श होऊन राहिले आहे. त्याने जीवनाच्या सर्व क्षेत्रात खेळ, समाज, तत्वज्ञान, नैतिकता,कर्तव्य एक आदर्श निर्माण केला आहे. जो आपल्याला एका दीपस्तंभासारखा दिशा दाखवत राहील.
श्रीकृष्णाने गीतेत सांगितल्याप्रमाणे आपण नेहमी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य करीत रहावे. फळाची किंवा कोणत्याही लाभाची अपेक्षा ठेवू नये. आसक्तिरहित कर्मच श्रेष्ठ ठरते. अशा या प्रयत्नवादी, ध्येयवादी पुरुषोत्तमाने सांगितलेल्या मार्गावरून चालण्याचा निश्चय करणे हाच गोकुळाष्टमीचा संदेश आहे.
———————————————————————————
गोकुळाष्टमी
तिथी : श्रावण वद्य अष्टमी
इतिहास
भगवान श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असतांना झाला.
महत्त्व
१. जन्माष्टमीला श्रीकृष्णतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. या तिथीला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप, तसेच श्रीकृष्णाची अन्य उपासना भावपूर्ण केल्याने श्रीकृष्णतत्त्वाचा अधिक लाभ मिळण्यास साहाय्य होते.
२. मासिक पाळी, अशौच आणि स्पर्शास्पर्श यांचा स्त्रियांवर होणारा परिणाम या दिवशी केलेल्या उपवासाने, तसेच ऋषीपंचमीच्या व्रताने न्यून होतो. (पुरुषांवर होणारा परिणाम क्षौरादी प्रायश्चित्त कर्माने आणि वास्तूवर होणारा परिणाम उदकशांतीने न्यून होतो.)
उत्सव साजरा करण्याची पद्धत
या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात़ त्यानंतर प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसर्या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात.
दहीकाला
विविध खाद्यपदार्थ, दही, दूध, लोणी हे सगळे एकत्र कालविणे म्हणजे ‘काला’ होय. श्रीकृष्णाने व्रजमंडळात गायी चारतांना स्वतःची आणि सवंगड्यांच्या शिदोर्या एकत्र करून खाद्यपदार्थांचा काला केला अन् सर्वांसह ग्रहण केला. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली.
कृष्ण जन्माष्टमी लघुपट
दहीकाल्याच्या निमित्ताने होणारे गैरप्रकार रोखा !
हल्ली दहीकाल्याच्या निमित्ताने वाटमारी, बीभत्स नाच, महिलांची छेडछाड आदी गैरप्रकार सर्रास होतात. या गैरप्रकारांमुळे उत्सवाचे पावित्र्य नष्ट होऊन उत्सवातून देवतेच्या तत्त्वाचा लाभ तर होतच नाही, उलट धर्महानी होते. वरील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रयत्न केले, तरच उत्सवाचे पावित्र्य टिकून उत्सवाचा खरा लाभ सर्वांना होईल. असे करणे ही समष्टी स्तरावरची भगवान श्रीकृष्णाची उपासनाच आहे.
Leave a Comment